संस्थेची माहिती


माऊली,
रामकृष्णहरी

सध्याचे युग खुपच गतिमान आणि यांत्रिकमय झालेले आहे. भावभावना, संस्कार, भेटीगाठी, संवाद कमी झालेला आहे. व्यक्ति व्यक्तिंमध्ये, जाती जातींमध्ये, समाजा समाजामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. समाजामध्ये स्नेहाची भावना संपून एकप्रकारचा कोरडेपणा आलेला आहे. सामंजस्य, दुसऱ्याला समजून घेणे कमी झाले आहे. भौतीक सुखाच्या लालसेपोटी सहसंवेदना हरविली आहे. त्वरित यशाच्या नादात संयम संपला आहे. समस्यांना समर्थपणे हाताळण्याची मानसिकता राहिली नाही. त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. व्यसनाधीनता वाढली आहे. यातून बाहेर पडण्याकरता समाज संस्कारक्षम,संयमी, मानसीक, शरिरिकदृष्टया समर्थ असणे गरजेचे आहे. तसेच कुठल्याही परिस्थितीत मनाचे संतुलन न ढळणे, प्रत्येक स्थितित मन स्थिर ठेवणे, विवेक जागृत ठेवणे. उचित निर्णय घेता येणे. याकरता आध्यात्माची जोड असणे आवश्यक आहे.

पुर्वीच्या काळात संध्याकाळी मंदिरांमध्ये हरिपाठ, भजन, होत असत. मंदिरातील सात्विक वातावरणात सर्व एकत्र यायचे. चर्चा, सुख दुःखाच्या गोष्टी करायचे, यामुळे ते आपले दुःख विसरायचे. अडचणींवर उपाय सापडायचा, एकमेकांना मदत करायचे. त्यामुळे समाज समाधानी आणि स्थिर असायचा. जगण्याला पुन्हा नवीन उमेद मिळायची. परंतु आता मंदिरांतील हरिपाठ, भजन कमी होत असल्याने समस्या वाढत आहेत. याकरिता हे पुन्हा सुरु करावं लागेल. मुलांपासून सुरुवात करावी लागेल. मुलं सुसंस्कारित झालीत तर त्यांचेवरील संस्कार त्यांना पुढे आयुष्यभर उपयोगात येतील आणि ते सक्षम नागरीक होवून समर्थ भारत बनवतील. काही संस्था सुट्यांमध्ये शिबिरांचे आयोजन करते. परंतु हे शिबिरे पूर्ण वर्षभर नसतात, १५ दिवस, एक महिना, दोन महिने अश्या कालावधींचे असतात. त्यामुळे त्यांचा परिणाम पाहिजे त्या प्रमाणात होत नाही.

या सर्व मुद्दयांचा विचार करुन, शालेय शिक्षणासोबत वारकरी सांप्रदायाचे शिक्षण द्यावे असा विचार समोर आला. मुलं वर्षभर वारकरी सांप्रदायाचे शिक्षण घेतील आणि सोबतच शालेय शिक्षणसुद्धा घेतील.

"बुद्धिनिष्ठ तर्कशुद्ध ज्ञानावर आधारित काम करणाऱ्या आणि संशोधन करणाऱ्या स्वयंसेवकांची संस्था" "Volunteers Association for Rational Knowledge And Research Institute" VARKARI द्वारा संचालित माऊली कृपांकित आप्पाजी महाराज गुरुकुल वारकरी ज्ञानपीठ, श्री क्षेत्र कुऱ्हा (बहिरम), ता. चांदुर बाजार, जि. अमरावती", अंतर्गत गुरुकूल निवासी पाठशाळेची निर्मिती करण्यात आली. संस्था, कुऱ्हा ( बहिरम ) येथे आहे. अमरावती जिल्हात चांदूर बाजार तालुक्यात परतवाडा पासून 12 कि.मी अंतरावर परतवाडा खरपी करजगांव शिरजगांव रोडवर आहे. तसेच चांदूर बाजार पासून 20 कि.मी. अंतरावर चांदूरबाजार कोंडवर्धा करजगांव रोडवर आहे.

मुलांना गावातील शाळेत पाचव्या वर्गात प्रवेश देण्यात येतो. पांचवी ते दहांवी पर्यंत त्यांचे शालेय शिक्षण सुरु असेल तेंव्हाच त्यांना गुरुकुल निवासी पाठशाळेत प्रवेश देण्यात येतो. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त इतर वेळेस ती मुलं संस्थेच्या निवासी पाठशाळेत असतील.

संस्थेच्या निवासी पाठशाळेत मुलांना स्तोत्रे, गीता, हरिपाठ, अभंग, गाथा, संत चरित्र्य, संत वांग्डमय इत्यादि शिकविण्यात येते. तसेच संस्कृत, शास्त्रोक्त पद्धतीने मृदूंग वादन, विणा, टाळ, पावली असे वारकरी सांप्रदायाचे शिक्षण देण्यात येते. योग, शारिरिक व्यायाम, मैदानी व बौद्धिक खेळ, संगणकीय शिक्षण, मुलांची सहल, स्नेहसंम्मेलन, पालक एकत्रीकरण, व्यक्तिमत्व विकास अश्या विविध अभ्यासातून / कार्यक्रमांच्या आयोजनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करण्यात येतो. म्हणजेच वारकरी सांप्रदायाचे शिक्षणासोबतच शालेय शिक्षण. इयत्ता पांचवी ते दहावी असे सहा वर्षे मुलांचे शालेय शिक्षण आणि वारकरी सांप्रदायाचे शिक्षण असे दोन्ही शिक्षण सुरु राहील. त्यामुळे मुलं सुसंस्कारीत सुशिक्षीत सक्षम नागरिक होतील.

संस्थेची तीन मजली सुसज्य इमारत आहे. तळ माळयावर कार्यालय, अन्नपुर्णा गृह, भोजन कक्ष आहे. मुलांना वारकरी सांप्रदायाचे शिक्षण पहिल्या माळयावरील सुसज्य सभागृहात देण्यात येते. दुसऱ्या आणि तीसऱ्या माळ्यांवर मुलांचा निवास आहे. प्रत्येक वर्षी पांचव्या वर्गात दहा मुलांना प्रवेश देण्यात येतो. सहा वर्षात एकूण साठ मुलं निवासी पाठशाळेत असतील. सर्व शिक्षण नि:शुल्क आहे. सर्व खर्च संस्थेमार्फत करण्यात येतो.
या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राची अध्यात्मिक परंपरा असलेल्या वारीचा वसा पुढच्या पिढीला मिळेल आणि वारकरी संप्रदायाची भक्तीपरंपरा ही तरूणाईसाठी केवळ वारीपुरती मर्यादित न राहता ती त्यांची जीवनपद्धती होईल.

Create your account